Tuesday 25 September 2012

लासलगावच्या निमित्ताने,


लासलगावच्या निमित्ताने,
भारतीय शेतमाल बाजारात परकीय गुंतवणूकीच्या परिणामाबाबत चर्चा चालू असतांनाच भारतीय शेतमाल बाजार हा कसा एकाधिकारी प्रवृत्तींच्या ताब्यात गेला आहे याची एकेक उदाहरणे बाहेर येऊ लागली आहेत. कदाचित या परकीय गुंतवणुकीमुळे पुढे येणा-या संकटांची काळजी करीत यातला प्रत्येक घटक आपल्याला सुरक्षित करण्याच्या प्रयत्नात दिसतो आहे.
लासलगाव ही भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील कांद्यांची प्रमुख बाजार पेठ मानली जाते. या बाजार पेठेतून देशांतर्गत व निर्यातीची उलाढाल होत असते. या बाजार समितीत सततच्या वाढत्या आवकीनुसार व बदलत्या बाजाराच्या गरजेनुसार काही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. त्याला विरोध म्हणून व्यापा-यांनी अचानक संपावर जाण्याचा निर्णय घेतला व बाजार समितीत आलेल्या कांद्याचे लिलाव बंद पाडले. अर्थातच अचानक झालेल्या या प्रकाराने शेतकरी खवळला व रस्त्यावर आला. कायदा सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊन प्रशासनालाही सुचेनासे झाले.
झालेल्या तिढ्यातून मार्ग काढण्यासाठी शेतकरी संघटना, बाजार समितीचे व्यवस्थापन, तालुका निबंधक, तहसीलदार व पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक बाजार समितीच्या कार्यालयात बोलावण्यात आली. या बैठकीतून काही गोष्टी पुढे आल्या त्यावरून सा-या शेतमाल बाजारात परंपरांचा आधार घेत अनेक अनिष्ट प्रथा चालत आल्या असून कायद्याला आव्हान देत सा-या शेतक-यांना वेठीस धरण्याचे काम चालू आहे.
त्याचे झाले असे की निर्यातीच्या व बाहेरच्या काही व्यापा-यांच्या गरजेनुसार शेतक-यांनी बाजारात कांदा आणतांना प्रतवारी करून गोणीत भरून आणावा म्हणजे बाहेरच्या व्यापा-यांचे वेळ व श्रम वाचून शेतक-यांना दोन पैसे वाढीव भाव देता येईल असा निर्णय घेण्यात आला. हा गोणी विभाग स्वतंत्र असून त्याचे खरेदीदार व्यापारीही वेगळे आहेत. याला पूर्वीच्या व्यापा-यांचा विरोध असून नवीन व्यापा-यांना व्यापार करण्याची परवानगीच देऊ नये या हट्टापोटी जून्या व्यापा-यांनी सारी बाजार पेठ बंद पाडली आहे. यातला एक गंभीर प्रकार म्हणजे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये खरेदी करणा-या सा-या व्यापा-यांची संघटना असून या सा-या बाजार समित्यातून कोणाही नव्या व्यापा-याला खरेदीची परवानगी देऊ नये असा ठरावच या संघटनेने केला आहे. इतर बाजार समित्या हा ठराव इमाने इतमाने पाळत असतांना लासलगावच्या बाजार समितीने आपल्या वाढत्या व्यवहारानुसार व्यापा-यांची संख्या वाढवणे व बाहेरच्या बाजारानुसार सुधार अमलात आणण्याच्या दृष्टीने हे निर्णय घेतलेले दिसतात. पूर्वी बाजारात येणारा माल व त्याचे प्रमाण यानुसार व्यापा-यांची जी २०० ची संख्या होती ती आता १२५ येऊन व आता बाजारात येणा-या मालाचे प्रचंड प्रमाण बघता खरेदीदारांच्या संख्येत वाढ होणे हे शेतक-यांच्या व बाजाराच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. मात्र नवीन व्यापा-यांना, जे त्यांचेच भाऊबंद आहेत, त्यांना विरोध करण्याचे काम जूने व्यापारी करीत आहेत. शोषणाचे हत्यार आमच्याच हाती रहावे व त्याचे फायदेही आम्हालाच मिळत रहावेत अशी ही मानसिकता आहे. ज्या शेतक-यांसाठी या बाजार समित्या स्थापन झाल्या आहेत त्यावर खरे अधिपत्य व्यापारी, हमाल व माथाड्यांचेच आहे हे या उदाहरणावरून दिसून येते.
अजून तरी या समस्येवर तोडगा निघाला नसल्याने हा तिढा कायम आहे व येणारा काही काळ तरी शेतक-यांच्या दृष्टीने गैरसोईचा ठरणार आहे. कारण मोकळा कांदा विभाग या व्यापा-यानी संपावर जात बंद केला असून शेतक-यांनी गोणीबंद कांदा आणल्यास त्याचा लिलाव होऊ शकेल अशी आजची परिस्थिती आहे. काही काळ शेतक-यांनी परिसरातील इतर बाजार समित्यांचा आसरा घ्यावा असेही होऊ शकेल. हा सारा बाजार खुला होईपर्यंत शेतक-यांच्या नशिबात काय काय लिहून ठेवले आहे हे पहाणे आपल्या हाती आहे.
                                         डॉ.गिरधर पाटील.

 

Thursday 20 September 2012

दरवर्षी सार्वमत देणा-या निवडणुका


भारतातील लोकशाहीकरण – एक समस्या
भारत हा जगातील, लोकशाही स्वीकारलेला एक मोठा देश, म्हणून ओळखला जातो. सरंजामशाहीतून पारतंत्र्यात गेलेल्या व कालांतराने स्वतंत्र झालेल्या देशांना उपलब्ध पर्यायांतून तसा नवीन व फारसा वादग्रस्त नसलेला लोकशाहीचा पर्याय निवडावा लागल्याने अनेक देशांनी तो स्वीकारला देखील. यापूर्वीच लोकशाही स्वीकारलेल्या व नांदवणा-या देशांची उदाहरणे समोर असतांनाच लोकांची, लोकांसाठी, लोकांकरवी हे लोकशाहीचे ब्रीदवाक्यच सा-या नागरीकांना लुभावणारे व आश्वासक वाटल्याने आता आपली सत्ता आली म्हणजे नवराष्ट्र हे सर्वांना हितकारी ठरेल हा भाबडा आशावादही त्यामागे होता. मात्र लोकशाही स्वीकारणे व ती अंगीकारणे यातली तफावत लक्षात न आल्याने व केवळ लोकशाही स्वीकारल्याने सारे प्रश्न सुटतील असे गृहीत धरल्याने आज आपल्याला लोकशाही असून देखील एक सर्वव्यापी जनअसंतोषाला सामोरे जावे लागते आहे. एका वेगळ्याच संस्कृतीत वाढलेल्याने नवीन धर्म स्वीकारावा आणि त्या धर्माची शिकवण वा तत्वे न पाळता केवळ धर्म स्वीकारला म्हणून उध्दाराची वाट पाहावी आणि अपेक्षाभंगाने स्वीकारलेल्या पर्यायावरच शंका व्यक्त करावी असे आपल्या सर्वांचे झाले आहे असे वाटते.
     मुळात भारतीय जनमानसाचा पिंड हा राजकीय नाही. राजकारण करावे ते राजेरजवाड्यांनी व त्यात असलेल्या संबंधितांनी हा पिढ्यांपिढ्यांचा संस्कार अचानक पुसला जाणार नव्हता. आजवर शोषिताची भूमिका बजावत आलेल्यांच्या मनात सरकार या व्यवस्थेबद्दलची भीती व मायबाप असल्याचा आदरही असायचा.  त्यातूनही या लोकशाहीत लोकसहभागाची व्याप्तीही एकदा निवडून दिले की आपले कार्य संपले यापुरतीच मर्यादित रहात गेल्याने जनताही आपल्या सहभागाची गरज व अधिकार हळूहळू विसरत व गमावत गेली. यात कोणाचा दोष असण्यापेक्षा याची परिणती कशात होईल हे लक्षात न आल्याने एक नैसर्गिक वाटचाल म्हणूनही समजता येईल. परंतु या रस्त्याने आपण कुठे येऊन ठेपलो आहोत, व यात काहीतरी चुकते आहे अशी भावना मात्र आज सर्वदूर निर्माण झाली आहे हे वास्तव आहे.
     सर्वसामान्य जनतेचा व लोकशाही प्रक्रियेचा तसा सरळ संबंध येतो तो निवडणुकीत व तोही पाच वर्षांतून एकदा. एकदा निवडणुका आटोपल्या की सा-यांचे लक्ष निवडून आलेले आपल्यासाठी व आपल्या नावाने काय काय करतात याकडे. मात्र एकदा अधिकार दिल्याने त्यात ढवळाढवळ करणे संसदीय लोकशाहीचा बागुलबुवा दाखवत अशक्यप्राय होत गेल्याने बदलासाठी पाच वर्ष परत वाट पहाणे हाती उरते. या पाच वर्षात घडणा-या घटनांचा आवाका व वेग बघता पुढच्या निवडणुकांच्या वेळी नेमकी काय परिस्थिती असेल हेही अनिश्चित. शिवाय निवडणुकांवर स्वार होणा-या कुणाच्या तरी अकस्मात मृत्युची सहानुभूती, परकीय आक्रमण, आर्थिक वा दहशतवादी अरिष्टांच्या लाटा यात नेमक्या जनतेच्या आशा आकांशा व्यक्त होतीलच असे होत नाही.
     यावरचा एक उपाय म्हणून नागरिकांचा या लोकशाही प्रक्रियेशी अधिकोधिक संबंध कसा आणता येईल हे पहाणे व भारतासारख्या महाकाय देशाच्या सा-या राजकीय, सामाजिक, आर्थिक निर्णय प्रक्रिया या पाच वर्षिय कालखंडात अडकवून न ठेवता तत्कालिन परिस्थितीच्या गरजा व लोकेच्छा यासह प्रवाही कशा होतील हे पहाणे आवश्यक ठरेल. यासाठी करावे लागणारे बदल वा सुधार हे मूलगामी स्वरूपाचे असल्याने सुरवातीला नैसर्गिक न्यायानुसार ते धक्कादायक वाटतील व स्वीकारण्यातही स्थितीवाद्यांना जड जाईल तरीही ते अपरिहार्य असल्याने त्यांचा विचार होणे आवश्यक आहे.
     निवडणुका या केवळ मतदानाशी निगडीत नसतात. त्यावेळचे देशासमोरचे प्रश्न, त्यावर घेतलेल्या विविध पक्षांच्या विविध भूमिका, त्या निमित्ताने घडणारे वैचारिक मंथन यानी सारा देश ढवळून निघत असतो. अगदी ज्याला राजकारणात काही रस वा गम्य नाही असाही सभोताली काय चालले याबद्दल उत्सुक असतो. म्हणजेच निवडणुक काळात सारे वातावरण राजकीय दृष्ट्या कसे भारावलेले असते. सर्वसामान्यांना राजकीय शिक्षित करण्याची ही वेळ असते आणि जे काही लोकशाहीकरण होते ते याच काळात होत असल्याचे दिसून येईल. म्हणजे असे वातावरण जेवढा काळ वाढवता येईल तेवढी लोकशाही जनमानसात रूजण्याची शक्यताही वाढत असल्याचे दिसून येईल.
     सध्या आपण ५४० खासदारांच्या निवडणुका, ज्यात नागरिकांचा सरळ संबंध येतो, दर पाच वर्षांनी एकाच वेळी घेतो. या निवडणुका जर लोकप्रतिनिधिंचे घटनादत्त अधिकार न डावलता जर ठराविक कालावधित टप्प्याटप्प्याने घेतल्या तर देशात ब-याच काळ ही लोकशाहीकरणाची प्रक्रिया राबवता येईल. यात सातत्य व गतिमानता ठेवतानाच प्रत्येक खासदाराला त्याचा पाच वर्षाचा प्रातिनिधित्वाचा कालखंड पूर्ण करता यावा व कुठल्याही काळात लोकसभेत ५४० खासदारांची उपस्थिती हे दोन महत्वाचे निकष पाळता येतील.
     संकल्पना अधिक सोपी करण्यासाठी एक उदाहरण घेता येईल. पाच वर्षांच्या कालखंडात ६० महिने येतात. या काळात जर ५४० खासदार निवडून आणायचे असतील तर दर वर्षी १०८ खासदार निवडता येतील. म्हणजे या वर्षी निवडलेले १०८ खासदार त्यांची ५ वर्षांची मुदत पूर्ण करून बरोबर पाच वर्षांनी त्यांचे मतदारसंघ पुढच्या निवडीसाठी तयार राहतील. अशारितीने दर वर्षी वेगवेगळे मतदारसंघ खुले करून संपूर्ण भारतात कायमस्वरूपी लोकशाहीकरणाला पूरक असे वातावरण निर्माण करता येईल. मात्र ही लोकसभा दहावी, अकरावी वा बारावी असे संबोधता येणार नाही, कारण सतत कुठल्याही वेळी कायमस्वरूपी ५४० खासदार यात उपस्थित असतील.
     सुरूवातीला काही घटनात्मक पेच येऊ शकतील. यात निवडणुका लांबवण्याचा अधिकार वापरता येईल. लोकसभेची मुदत संपल्यानंतर ही पध्दत स्वीकारतांना दर वर्षी लॉटरी पध्दतीने १०८ मतदारसंघ निवडून त्यात निवडणुका घेता येतील. तोवर इतर सर्वांना त्यांची पाळी येईपर्यंत मुदतवाढ देण्यात येईल. एकदा पहिले चक्र पूर्ण झाले की लॉटरी पध्दतीची गरज रहाणार नाही, कारण पाच वर्षांची मुदत पूर्ण झालेले मतदारसंघ निवडणुकीला तयार असतील.
     लोकशाहीकरणाबरोबर होणारा महत्वाचा फायदा म्हणजे तत्कालिन प्रश्न व समस्यांवर पक्षांची भूमिका व जनमत काय आहे याचे प्रतिबिंब याचे प्रातिनिधिक सार्वमत या निवडणुकांमधून व्यक्त होऊ शकेल. जनमतानुसार पक्षांना, विशेषतः सत्ताधारी पक्षाला आपले निर्णय करावे लागतील, भूमिका घ्याव्या लागतील, हा एक मोठा फायदा यात दिसतो. शिवाय लोकानुयय करणारे व आश्वासने देऊन न पाळणारे पक्ष सावध होतील, कारण लागलीच दुस-या निवडणुकीस सामोरे जावे लागणार असल्याने असले प्रकार आपोआपच बंद होतील.
सध्या या निवडणुकांशी संबंधित असणारा निवडणुक आयोग, त्यात सहभागी होणा-या सरकारी यंत्रणा, राजकीय पक्ष, माध्यमे या सा-यांवर एकत्रित निवडणुकांचा अचानकपणे ताण येतो. या गोंधळाच्या वातावरणात मतदारही भांबावल्याने निर्णयक्षम रहात नाहीत. निवडणुक आयोगाच्या क्षमता लक्षात घेता मतदारसंघात एकादा निरिक्षक पाठवण्यापलिकडे त्यांना या निवडणुकांवर नियंत्रण ठेवता येत नाही. शेवटच्या दिवसांपर्यंत मतदार याद्या सदोष असतात. सनदी अधिका-यांच्या अधिपत्याखाली तयार होणा-या याद्या सहेतुकपणे तशा ठेवल्या जातात असा आरोप होतो. प्रशासनही मनुष्यबळ व वेळ कमी असल्याच्या आड लपते. आता १०८च मतदारसंघात निवडणुका असल्याने अशा सबबी त्यांना सांगता येणार नाहीत. एकत्रित घेण्यात येणा-या निवडणुकांतील धांदलीचा गैरफायदा घेऊन अनेक लोकशाही विरोधी कृत्ये केली जातात. प्रशासन व पोलीस यंत्रणेचा ताण कमी झाल्याने ते अधिक कार्यक्षमतेने या समस्या हाताळू शकतील.
महत्वाचा भाग म्हणजे सा-या राजकीय पक्षांना सुसंघटीत होऊन निवडणुकांना सामोरे जाता येईल. आपली संसाधने, क्षमता, प्रचारक, वक्ते, वाहने या  ठराविक मतदारसंघात त्यांना सुयोग्यपणे वापरता येतील. माध्यमांना सर्व पक्षांना योग्य जागा व वेळ देता येईल. पेड न्यूज सारखे प्रकार आटोक्यात येतील. पाच वर्षांतील एक संधी अशी पक्षांना जी तातडी वा निकड तयार होऊन येनकेन प्रकारे निवडून यायचेच म्हणून होणारी गुंडागर्दी वा दडपशाही आटोक्यात येईल, कारण जनताही तेवढीच सुसंघटीत झालेली असेल.
म्हणजे अत्यंत शांत परिस्थितीत शांत डोक्याने या निवडणुका पार पडल्या तर जनतेच्या लोकशाहीकरणाबरोबर जनमताचे योग्य ते प्रतिबिंब सदासर्वकाळ संसदेत पडत असल्याने व जनाधाराची टांगती तलवार सतत डोक्यावर असल्याने राजकीय पक्षांच्या मनमानीने भारतीय लोकशाहीला जे साचलेपणाचे वा साचेबंदपणाचे स्वरूप आले आहे ते जाऊन एक प्रवाही गतिमान लोकशाही अस्तित्वात येऊ शकेल असे वाटते.
                                           डॉ. गिरधर पाटील. Girdhar.patil@gmail.com